
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शौर्यगाथा – राजे उमाजी नाईक
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.७सप्टेंबर, २०२६:
राजे उमाजी नाईकांचा इतिहास भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सोनेरी पान आहे. सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिटिशांविरुद्ध सर्व प्रथम उठाव करणारे, याची इतिहासात विशेष नोंद आहे. उमाजी नाईक यांचे जीवन चरित्र अनेक घटनांनी भरलेले आहे. उमाजी नाईक यांनी अन्यायी, जुलमी राजवटीविरुद्ध सर्वांना संघटित करून प्रखर लढा दिला.
हिंदुस्तानमध्ये ब्रिटिशांचे राज्य सर्वत्र प्रस्थापित झालेले होते. त्यांना विरोध करण्याचे सामर्थ्य कोणामध्येही उरले नव्हते. या जुलमी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व सामान्यांनी मोठा उठाव केला. या उठावाचे नेतृत्व आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी केले.
पुरंदर किल्ल्याच्या कुशीत, सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगामध्ये कडेपठारीतून उमाजी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी केवळ इंग्रज सत्तेला विरोध नाही तर समांतर राज्य निर्माण केले होते. पुरंदर किल्ल्याच्या पूर्वेस वज्रगड किल्ला उमाजी राजांच्या राजधानी होती. इंग्रजांना पत्र लिहिताना ते उमाजी राजे मुक्काम डोंगर असे लिहीत. वज्रगडाजवळ असलेल्या एका डोंगरकपारीत राजे उमाजी नाईक यांचा दरबार भरायचा. एका मोठ्या दगडावर उमाजी नाईक राजा म्हणून बसायचे व समोर लोक बसायचे. अशावेळी बसलेल्या लोकांमध्ये रामोशी, मराठा, कुणबी, मुसलमान, भिल्ल, कोळी, परदेशी अशा वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक असायचे. समोर एक भगवा झेंडा लावलेला असायचा व दरबारातील लोक उमाजी नाईक यांना राजा म्हणून मुजरा करत होते. त्यांच्या दरबारातील चर्चा राजकीय कारभाराच्या असायच्या.
इंग्रज सत्तेला विरोध म्हणून एक जाहीरनामा त्यांनी काढला. ‘दिसता क्षणी इंग्रजांना ठार मारावे, कोणीही त्यांना शेतसारा देऊ नये’ असे फर्मान काढले. सर्वजण त्यांच्या आज्ञेचा आदर करत होते. किल्ले पुरंदरच्या परिसरातील पिंपरी, हरगुडे, पांगारे, साकुर्डे, पानवडी, गराडे अशा गावातील लोकांनी त्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत.

कॅप्टन मॅकिंटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने १८३३ मध्ये उमाजी नाईक यांच्याबाबत लिखाण करून ठेवले आहे. सरकार दरबारी असलेल्या माहितीनुसार राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्य युद्धातील पहिले क्रांतीवीर होते हे सिद्ध होते.

पुरंदरच्या मातीत भिवडी गावात जन्म घेतलेल्या या क्रांतीवीराने व त्यांच्या साथीदारांनी शौर्य व बुद्धीचातुर्याने स्वकीयांचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याचा पुरंदरवासीयांना, भारतीयांना अभिमान आहे.
राजे उमाजी नाईक यांच्या लढ्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. स्वातंत्र्याचा पहिला लढा या देशातील सर्वसामान्य लोकांनी दिला होता. त्यांच्या कार्यातून एकात्मतेचा संदेश मिळतो, राजे उमाजी नाईकांचा इतिहास भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सोनेरी पान आहे.
शब्दांकन :
प्रा. गंगाराम जाधव – सासवड (पुरंदर)
प्रवक्ते : जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य
