
🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01 (सुरेश गायकवाड):
नवीमुंबई- श्री देवाळेश्वर मैदान, खारघर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाऊंडेशन (रजि.), खारघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्त्रीसन्मान आणि आरोग्य जनजागृती यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास शामराव तांबे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत राजर्षी शाहू महाराजांच्या समतावादी आणि लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यानंतर फाउंडेशनचे सदस्य आणि खारघर सेक्टर ११ रेसिडेंट असोसिएशनचे जितेंद्र बनसोडे यांनी आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालनातून संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.
वक्ते मंगेश गवारे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्वधर्मसमभाव या विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले. “सर्व माणसे समान आणि प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी” हा शाहू महाराजांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे त्यांनी प्रभावी शब्दांत अधोरेखित केले.
महिलांमधून नलिनी सातपुते आणि मनीषा मुरकुटे यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी मनोगते व्यक्त करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता प्रभावीपणे मांडली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी कुंदन हवेलीकर आणि शुभांगी पवार यांनी उपस्थित सर्व महिलांच्या वतीने आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या महोत्सवाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प केला. तसेच “एक झाड – एक छत्री” या अभिनव उपक्रमांतर्गत महिलांना संस्थेतर्फे छत्री भेट देण्यात आली. झाड आणि छत्रीचा हा सुंदर संगम पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारी यांचे प्रभावी प्रतीक ठरला.
समाजाच्या आरोग्याचा विचार करून मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह सुमारे एकोणपन्नास नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन उपस्थितांसाठी चहा व थंड पिण्याच्या पाण्याचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमातील प्रत्येक उपक्रमाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहू महाराजांचे समतेचे, शिक्षणाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचावेत आणि असे विधायक उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्कार समितीचे प्रदीप कांबळे, राजाराम माळी,सुनील म्हसकर,अशोक साळवी, रतन बासुतकर,प्रशांत शिंगणे,श्रीकांत ढोबळे आणि जितेंद्र बनसोडे तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे सर्व नागरिक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, खारघर सेक्टर ११ मॉर्निंग वॉकर ग्रुप यांनी मोलाचे योगदान दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा केवळ इतिहासाचा भाग नसून वर्तमान आणि भविष्य फ प्रेरणा आहे. खारघरमध्ये आयोजित हा जयंती महोत्सव त्या प्रेरणेला कृतीची जोड देणारा, समाजाला नवी दिशा देणारा आणि प्रत्येकाच्या मनात समतेची ज्योत प्रज्वलित करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.
