
🔳 मुंबई विशेष प्रतिनिधी 🔳 : ०६जुलै,२०२६: (दीपक कैतके):
कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवनावर गंभीर परिणाम केले असून, महत्त्वाच्या वाहतूक मार्गांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, प्रशासनाने युद्धपातळीवर मार्ग मोकळा करण्याचे काम हाती घेतले आहे. दरडीचा काही भाग निवासी वस्त्यांपर्यंत पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
केवळ कशेडी घाटच नव्हे, तर वरंधा घाटाची परिस्थितीही बिकट बनली आहे. वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या टप्प्यावर चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ढगफुटीसदृश पावसाचा जोर कायम असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत.
रायगड जिल्ह्यातही पावसाचे थैमान सुरू आहे. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ बार्जेस वाहून आल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून मंडणगड-म्हाप्रळ आणि गोरेगाव-माणगाव मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. याशिवाय, पेण-खोपोली मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
सुधागड तालुक्यातील कानसळ येथे अंबा नदीपात्रात अडकलेल्या १२ कामगारांची स्थानिक प्रशासनाने धाव घेत सुखरूप सुटका केली आहे. सद्यस्थितीत पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाले आहे. पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परिस्थिती नाजूक असून, प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांचेच पालन करण्याचे आवाहन केले आहे.
