
🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01जुलै: (सुरेश गायकवाड):
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितेमुळे कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य, ३ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. या नवीन श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने कामगार संघटनांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा.
कामगारांच्या सेवा अटी, रोजगारातील सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक अधिकार यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. तसेच कामगार हिताला बाधा पोहोचेल, असे कोणतेही नियम लागू करू नयेत, अशी मागणी समितीने केली.
राज्य सरकारने सर्व संबंधित पक्षांशी, संघटनांशी चर्चा करून कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारा निर्णय घ्यावा. नाहीतर कामगार उध्वस्त होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कृती समितीमध्ये टी.यू.सी.आय, सीटू, इंटक, एच.एम.एस, टी.यू.सी.सी, आयटक, बी.के.एस, आय.सी.सी.टी.यू, एम.आय.यू.टी.यू.सी, यु.टी.यु.सी. या कामगार संघटना आंदोलनात सामील होणार आहेत. विवेक माँटेरो, दामले, संतोष चाळके, निवृत्ती धुमाळ, गोविंदराव मोहिते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
