
🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 (सुरेश गायकवाड) दि.१९:
महाराष्ट्रातील खेळांडूच्या न्यायासाठी व क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्यभरातील १२०० हून अधिक खेळाडूंनी एकत्र येत २३ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. जोपर्यत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक महेश कृष्णा इंदापुरे (छत्रपती संभाजीनगर) आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सुरेखाताई शिरसाट करणार आहेत. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये सी.बी.एस.ई. बोर्डाच्या खेळाडूंना एस.एस.सी. प्रमाणे ग्रेस मार्क्स देणे, क्रीडा आरक्षण ५ टक्क्यांवरून १० टक्के करणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना थेट सरकारी नोकरी देणे, खेळाडूंची शिष्यवृत्ती वाढविणे, प्रशिक्षक व पंचांचे मानधन वाढविणे, महिला खेळाडूंसाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना सुरू करणे आणि खेळाडू विमा योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय क्रीडा विभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची, प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची, तसेच विभागीय क्रीडा संकुलाला “युवराज छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल” असे नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महेश कृष्णा इंदापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंना न्याय मिळावा आणि क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यातील शिवछत्रपती पुरस्कारार्थी तसेच अन्यायग्रस्त खेळाडूंनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
