
🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.३०जुलै,२०२६:
कायम दुष्काळाची परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उजाड माळराने अशी ओळख असलेल्या वाघापुर (ता. पुरंदर) पंचक्रोशीत गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या आपुलकी सोशल फाउंडेशन या संस्थेने नुकतेच वाघापुर येथील माणकेश्वर मंदिर परिसरात यावर्षी आठशे देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान दिले. यापूर्वीही सुमारे दोन हजार वृक्ष लागवड करून उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना, टॅंकर द्वारे पाणी घालून वृक्षांची जोपासना केली आहे.
वाघापुर येथील आपुलकी फौंडेशन ही संस्था शिक्षण, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रात गेली अनेक वर्षे विविध उपक्रम घेवून ग्रामविकासाचे काम करत आहे. यावर्षीही आठशे देशी वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करण्याचा निर्धार या संस्थेने केला आहे. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमास पुरंदर तालुका सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी सौ. यशश्री भालेराव, वाघापुर गावातील अनेक तरूण, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच भार्गवी फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रसाद पाटील व त्यांचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांनी या वृक्षारोपण चळवळीला मोठे योगदान दिले आहे, अशी माहिती आपुलकी फाउंडेशनचे सचिव वसंतभाऊ कुंजीर यांनी दिली.
